कोळगाव परिसराला अवकाळी चा फटका
कोळगाव परिसराला अवकाळी चा फटका
गहू, कांदा भुईसपाट तर फळबागांखाली सडा
महा शिक्षण टाइम्स :
कोळगाव आणि परिसरात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले गहू, कांदा व इतर पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड व माजी सरपंच हेमंत नलगे व सोसायटी चेअरमन विश्वास थोरात यांनी केली आहे.
काल सायंकाळी परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात आकाशात काळे ढग दाटून आले. जोराचा वारा सुटला व काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली. भर उन्हाळ्यात झालेल्या या पावसामुळे जरी परिसरात गारवा निर्माण झाला तरी शेतकऱ्यांना अवकाळी चा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील गहू, कांदा, बाजरी, कलिंगड, खरबूज, काकडी, द्राक्षे, पपई, आंबा, भाजीपाला अशा विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अवकळीने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. शेतात उघड्यावर काढून पडलेला कांदा भिजला तर उभे असलेले गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे.
कोळगाव आणि परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे तलाठी, मंडल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी सरपंच हेमंत नलगे व सोसायटी चेअरमन विश्वास थोरात यांनी केली आहे.
error: Content is protected !!